पाचल : आपण जरी अधिकारी असलो तरी जनतेचे सेवक आहोत. या भावनेतून काम करणारे पाचल महावितरण कार्यालयातील कनिष्ठ शाखा अभियंता शेट्ये हे एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे प्रतिपादन पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये यांनी केले. शेट्ये यांची राजापूर येथे बदली झाल्यानिमित्त त्यांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम पाचल ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मासये बोलत होत्या.
यावेळी उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम सुतार, सिद्धार्थ जाधव, पत्रकार सुरेश गुडेकर उपस्थित होते. उपसरपंच किशोर नारकर म्हणाले की, शेट्ये यांनी शाखा अभियंता म्हणून प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. त्यामुळे त्यांनी स्वत:बरोबरच आपल्या खात्याची प्रतिमा उंचावून खात्याबद्दल जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना शेट्ये म्हणाले की, पाच वर्षे काम करताना पाचल ग्रामपंचायतीने आपल्याला मोलाचे सहकार्य दिले. त्यामुळे माझी पाच वर्षांची सेवा सर्वसामान्य जनतेच्याप्रति सार्थकी लागल्याची विनम्र भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आत्माराम सुतार, सिद्धार्थ जाधव, अर्जुन नागरगोजे यांनीही मनोगत व्यक्त करताना शेट्ये यांना शुभेच्छा दिल्या.