शोभना कांबळे --रत्नागिरी---हिऱ्याची चमक कुठेही लपत नाही म्हणतात. फक्त त्याला गरज असते ती योग्यरित्या पैलू पाडणाऱ्या जवाहिऱ्याची. माधुरी आणि करिश्मा या दोन अनाथ राऊत भगिनींची कथाही अशीच काहीशी. देवरूखच्या मातृमंदिर आणि त्यानंतर रत्नागिरीच्या प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहाच्या या दोन मानसकन्यांच्या इच्छारूपी जिद्दीला या दोन संस्थांनी शिक्षणाचे पंख दिल्याने या दोघी भगिनी आता उच्च शिक्षणाच्या दिशेने भरारी घेऊ लागल्या आहेत. माधुरी राजेंद्र राऊत ही अनाथ असल्याने मुंबईच्या बालगृहात वाढली. दुसरीला असताना ती देवरूखच्या गोकुळ या बालगृहात दाखल झाली. वर्षभरातच तिच्या पाठची बहीण करिश्मा हीसुद्धा गोकुळमध्ये आली. गोकुळमध्ये संस्थेच्या प्रेमाच्या छायेखाली या दोन्हीही बहिणी वाढत होत्या. शिक्षणाबद्दल अतिशय आवड असल्याने सुरुवातीपासूनच दोघींचीही अभ्यासातील गती चांगली होती. माुधरीने दहावीला ७१.८० टक्के गुण मिळविले. तिने दहावीनंतर मेकॅनिकल ड्राफ्टस्मनचा कोर्स घेण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा तिचा निर्णय धाडसीच होता. कारण या अभ्यासक्रमाला मुली जातच नाहीत. पण, संस्थेने तिच्या इच्छेचा आदर करीत तिला रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन दिला आणि माधुरी रत्नागिरीच्या प्रतिभा महिला शासकीय वसतिगृहात दाखल झाली. या वसतिगृहाच्या अधीक्षक मंदा पाटील तसेच जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी जे. एस. शेख यांनी तिला अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्याच वर्षी तिला अ श्रेणी मिळाली. या कालावधीत तिने संगणक कोर्सही पूर्ण केला. यावर्षी तिने द्वितीय वर्षाची परीक्षा दिली. परीक्षेपूर्वीच पुण्यात झालेल्या भरती मेळाव्यात पुण्यातील एका बड्या कंपनीने प्रशिक्षणार्थी म्हणून तिची निवड केली आहे. नोकरी करतानाच या क्षेत्रातील अभियंता बनण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यामुळे आता नोकरी करतानाच ड्राफ्टस्मन इंजिनिअरींग परीक्षा देण्याची तिची इच्छा आहे.माधुरीची बहीण करिश्मा देवरूखच्या महाविद्यालयात कला शाखेतून याचवर्षी बारावीत ६४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. कुठलीही शिकवणी नसतानाही तिने हे गुण मिळविले. माधुरी रत्नागिरीत असल्याने या दोघी बहिणी एकत्र असाव्यात, या उद्देशाने संस्थेने करिश्मालाही मातृमंदिरमधून येथे बोलावून घेतले. रत्नागिरीत आलेल्या करिश्माने बारावीनंतर पदवीधर व्हायचं, असच ठरवलं होत. पण, याच महत्त्वाच्या टप्प्यावर तिच्यासाठी दिशादर्शक ठरल्या त्या प्रतिभा महिला शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षका मंदा पाटील. त्यांनी तिला रत्नागिरीतील कीर विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. आता तिचे स्वप्न आहे ते वकील होण्याचे. त्यासाठी ती झटून अभ्यास करतेय.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेकॅनिकल ड्राफ्टस्मन या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेली माधुरी ही २१ मुलांमध्ये एकमेव विद्यार्थिनी होती. हा कालावधी पूर्ण करताना सुरूवातीला आपणाला एकटेपणा जाणवायचा. पण, आपले शिक्षक आणि वर्गातील मुलांच्या सहकार्यामुळेच आपणाला हा अभ्यासक्रम पूर्ण करताना कुठलीच अडचण आली नाही, असे माधुरी राऊत सांगते. आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तिची इच्छा आहे.समाजशास्त्र हा कश्मिरा हिचा विशेष आवडीचा विषय. या विषयाच्या अभ्यासाने सामाजिक बांधिलकीची जाणीव होते, सामाजिक भान येते, असे ती सांगते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा सतत या दोन भगिनींप्रमाणेच या संस्थेतील इतर मुलींनाही मिळत असते. आताचे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यु. एस. भोसले यांनी काहीही अडचण आली तर ती आपण दूर करू, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिकच सुकर होणार आहे.अनाथ कन्यांची उंच भरारीविशेष म्हणजे पहिल्या वर्षीच संस्थेने औदार्य दाखवून कश्मिरा हिला रत्नागिरीच्या कीर विधी महाविद्यालयाने फी मध्ये सवलत दिलीच; पण तिला पुस्तकेही उपलब्ध करून दिली. त्यामुळे तिचा प्रवेश सोपा झाला. अजूनही तिला बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे वकील होऊन आपल्यासारख्याच अनेकांसाठी आधारस्तंभ होण्याची इच्छा असलेल्या कश्मिरा हिला पुढेही संस्थेने असाच हातभार दिला तर एका अनाथ कन्येचे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. असे झाले तर कश्मिरा ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली वकील असेल. आपल्या या वाटचालीत संस्था आणि आपल्या शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे ती सांगते.
उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना जिद्द आणि परिश्रमाचे पंख
By admin | Updated: October 16, 2015 00:47 IST