वातावरणही अप्रसन्न बनविते आणि त्या व्यक्तिंच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंवरदेखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही.
आपण स्वतः शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे, अगत्याचे आहे. शेवटी आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजात राहावे लागते आणि समाजातल्या अन्य व्यक्तींबरोबर परस्पारिक संबंध ठेवावे लागतात. अशा स्थितीत आपण शांतीपूर्वक जीवन कसे जगू शकतो ? कसे आपण आपल्या आतमध्ये सुख तसेच शांतीचे जीवन जगू शकतो, आणि कसे आपल्या आसपासही शांती आणि
सौमनस्याचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकतो, जेणेकरून समाजातले अन्य लोकही सुख आणि शांतीचे जीवन जगू शकतील.
आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, आपण अशांत व बेचैन का होतो. याकडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षांत येईल की, जेव्हा मन विकारामुळे विकृत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते. आपल्या मनांत विकारही आहेत आणि त्याचवेळी आपण सुख तसेच शांतीचा अनुभव घेऊ, हे अशक्य आहे.
हे विकार का आणि कसे उत्पन्न होतात? पुन्हा खोलवर शोध घेतल्यास हे स्पष्ट होते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला न आवडणारा व्यवहार करते किंवा जे घडते ते आपल्याला आवडत नाही, याची ती प्रतिक्रिया असते. अप्रिय घटना घडतात आणि आपण आंतरिक तणाव निर्माण करतो. मनाप्रमाणे न होण्यामुळे, किंवा मनाप्रमाणे होण्यात काही बाधा येत असेल तर आपण तणावग्रस्त होतो आणि अंतरमनांत गाठी बांधायला सुरूवात करतो. जीवनभर अप्रिय घटना होत राहतात, कधी मनाप्रमाणे होतात, कधी होत नाहीत आणि आपण जीवनभर प्रतिक्रिया करत राहतो आणि गाठी बांधत राहतो. आपले पूर्ण शरीर तसेच मन इतक्या विकारांनी, इतक्या तणावांनी भरून जाते की, आपण दुःखी होऊन जातो. या दुःखापासून वाचण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे आपल्या आयुष्यात अप्रिय घटना घडूच द्यायची नाही, सर्वकाही मनाप्रमाणे व्हावे किंवा आपल्याला अशी शक्ती जागृत करायला हवी, किंवा अशी शक्ती असलेला दुसरा कुणी मदतकर्ता असावा जो नको असणाऱ्या घटना घडूच देणार नाही आणि आपल्याला हवे असलेलेच होत जाईल. परंतु, हे अशक्य आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही, की ज्याच्या सर्व इच्छा सर्वकाळ पूर्ण होतील. ज्याच्या आयुष्यात सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडत राहील, अगदी मनाविरूद्ध काहीही न होता. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मनाविरूद्ध घटना घडतच राहणार. अशा वेळेस प्रश्न उठतो की, विषम परिस्थिती उत्पन्न झाल्यावर आपण अंध प्रतिक्रिया देणे कसे थांबवावे? कसे आपण तणावग्रस्त न होता शांत आणि संतुलित राहू शकू? याचा विचार करून आपण प्रत्येकजण शांततेने जगायला शिकूया. आपलं जगणं किती शांततेचे आहे ते केवळ आपल्यावर अवलंबून असते. हे मात्र विसरू नका.
- डॉ. गजानन पाटील, रत्नागिरी.