रत्नागिरी : कोरोनाकाळात शेतकऱ्यांना खरीप हंगामात भात बियाणे व खताची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी रोहिणी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयातर्फे केळ्ये व कोतवडे उंबरवाडी येथे शेताच्या बांधावर भात बियाणांचे वाटप करण्यात आले.
केळ्ये व कोतवडे उंबरवाडी गावातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्वतयारी व वेळेची बचत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून रोहिणी पंधरवड्यांतर्गत भात बियाणे, बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता चाचणी, बियाणे पेरणीसाठी गादीवाफे तयार करणे इत्यादी प्रात्यक्षिके वाडीवर आयोजित करण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.
शेतीशाळेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक एल. जे. मांडवकर, हर्षला पाटील, कृषी सहायक सतीश तायडे, गणेश जुवळे आदी उपस्थित होते.