चिपळूण : सावंतवाडी-दादर दरम्यान धावणाऱ्या सकाळच्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये चिपळूण येथे पाणी न भरल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. अनेक प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सावंतवाडी - दादर दरम्यान जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चिपळूण येथे पाणी भरले जाते. मुळात कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण, मडगाव किंवा क्वचितप्रसंगी पनवेल येथे पाणी भरले जाते. अनेक गाड्या पाणी भरण्यासाठी चिपळूण येथेच थांबतात. राज्यराणी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सुटत असल्याने त्या गाडीमध्ये चिपळूण येथेच पाणी भरण्याची व्यवस्था आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे राज्यराणी एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर आली व प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. या गाडीत पाणी नव्हते. चिपळूण ते खेड दरम्यान प्रवाशांना पिण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी पाणी मिळाले नाही. खेड येथे क्रॉसिंगसाठी गाडी थांबली असताना प्रवाशांना खूप वेळ ताटकळत राहावे लागते. यावेळी पाण्याची गरज असूनही पाणी न मिळाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कोकण रेल्वे प्रशासनाचे आपल्या गाड्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. केवळ पाणी भरण्यासाठी चिपळूण येथे गाड्या थांबवल्या जातात. परंतु, चिपळूण येथे प्रवाशांसाठी गाडी थांबवल्या जात नसल्याने मुळातच येथील प्रवाशांमध्ये असंतोष आहे. त्यातच तांत्रिक चुकीमुळे पाणी न भरल्यास प्रवाशांची गैरसोय होते. कोकण रेल्वे प्रशासन असे अनेक वेळा प्रवाशांना वेठीस धरत असते. कोकण रेल्वे प्रशासनाचे आपल्या गाड्यांकडे कायमचे दुर्लक्ष असते. केवळ पाणी भरण्यासाठी चिपळूण येथे गाड्या थांबवल्या जातात. मात्र प्रवाशासाठी त्या थांबविण्यात येत नसल्याने वेळोवेळी संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाच्या नावाने लाखोलीचिपळूण येथे पाणी न भरल्याने आली आफत. एक्स्प्रेसमध्ये पाणी नसल्याने खेड येथे क्रॉसिंगच्या वेळी प्रवाशांची गैरसोय. सातत्याने असे प्रकार रेल्वे प्रशासनाकडून घडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष. कोकण रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना अनेकवेळा धरते वेठीस.
पाणी न भरल्याने प्रवाशांची गैरसोय
By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST