लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : शहरातील बंदर धक्का येथील अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याच्या पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पर्यटन विकास योजनेंतर्गत २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी दिली. त्याला आदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे राजापूरच्या ब्रिटिशकालीन इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या बंदर धक्याच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांचा बंदर धक्का येथे संगम होऊन तेथून पुढे त्या एकत्रितपणे वाहतात. बंदर धक्का परिसर आणि येथील दोन्ही नद्यांचा संगम परिसर राजापूर शहराला लाभलेल्या ब्रिटिशकालीन इतिहासाच्या मूक साक्षीदार आहे. खोलगट भाग असलेल्या या संगमातून पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या बोटी, जहाजे, गलबते येत होती. त्यांच्यामधून येणारा माल बंदर धक्का येथे उतरविला जात होता. तेथून पुढे घाटमाथ्यावर त्या-त्या भागामध्ये पोहोचविला जात होता. या साऱ्या घडामोडींमधन ब्रिटिशकाळामध्ये राजापूर शहराचा प्रसिद्ध निर्यातकेंद्र म्हणून नावलौकिक होता. कालपरत्वे त्यामध्ये बदल झाला असला तरी, त्या वेळचा इतिहास आणि अनेक घडामोडींचा हा परिसर मूक साक्षीदार आहे.
नद्यांच्या संगमाच्या येथील परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने माजी आमदार खलिफे यांनी राज्याच्या पर्यटनमंत्री तटकरे यांच्याकडे पर्यटन विकास योजनेंतर्गत २५ लाख रुपये निधीची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्याला श्रीमती तटकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी सांगितले.