रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेक सुविधा व निधी मिळण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे खासदार नारायण राणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून, जर निधी उपलब्ध झाला तर जिल्ह्याचा योग्य प्रकारे विकास होऊन जिल्ह्याचा पर्यटन विकास सक्षम होईल. जिल्ह्यातील रस्त्यांची समस्या गंभीर असून, अनेक रस्ते खराब झाले असून ते नवीन करण्याची आवश्यकता आहे. तत्काळ रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. जिल्ह्यात अनेक गड, किल्ले असून, त्यांची अवस्था दयनीय झाली असून दुरुस्ती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे असून, तेथेही पार्किंग, प्रसाधनगृहे, पाण्याची, विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या सर्व व्यवस्था समुद्रकिनारी झाल्यास तेथे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, स्मारकांचा विकास होणे गरजेचे आहे. शहरातील लोकमान्य टिळकांच्या स्मारकाची दुरवस्था झाली असून, दुरुस्ती व्हावी, मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले असून, ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.