लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दोन वर्षांपूर्वी २ जुलै २०१९ रोजी तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटले आणि २१ जणांचे बळी गेले. दोन वर्षानंतर त्याचदिवशी म्हणजे २ जुलै २०२१ रोजी धरणग्रस्तांच्या जीवनात आनंदाची नवी पहाट आली आहे. अलोरे येथे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पहिल्या १० घरांचा ताबा धरणग्रस्तांना दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत तसेच सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. धरणग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सिद्धीविनायक ट्रस्ट धावून आला आहे. धरणग्रस्तांना एकप्रकारे ‘सिद्धीविनायक’च पावला. पुनर्वसन प्रकल्पाला ११ कोटींचा निधी सिद्धीविनायक ट्रस्टने मंजूर केला. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एकूण ५४ घरांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी ११ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. त्यापैकी ५ कोटी रुपये सिद्धीविनायक ट्रस्टने दिले. उर्वरित निधीही सिद्धीविनायककडून देण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या २४ घरांचा पहिला पुनर्वसन प्रकल्प अलोरे येथे उभा करण्यात आला असून, अत्यंत टुमदार आणि देखणी हवेशीर अशी सिद्धीविनायक नगरी येथे उभी करण्यात आली आहे.