रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोनाचा एक रूग्ण आढळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यादृष्टीने जिल्ह्याचा इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तोडण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत येण्यास तसेच रत्नागिरीतून बाहेर जाण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. दिनांक २३ मार्चपासून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत.कोरोनाविरोधातील या लढ्यात नागरिकांनी घरातच राहणे गरजेचे आहे. त्यासाठीच शासनाकडून संचारबंदी सर्वत्र लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिक काही ना काही कारण सांगून बाहेर पडत आहेत. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुचाकी वाहनांवर बंदी घातली आहे. तरीही अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीसाठी असणारी वाहने, या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी वगळून अन्य नागरिक फिरायला निघाल्यासारखे बाहेर पडत आहेत.रत्नागिरीनजिकच्या कुवारबाव, परिसरात अजूनही मुंबईतून नागरिक खुलेआम येत आहेत. शहरातील धनजी नाका येथील दुकानांमध्ये आजही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मुख्य मार्ग सोडला तर अन्य भागात नागरिकांचा मुक्त संचार सुरू असून, विनाहेल्मेट गाडी चालवणे, नियम मोडून दुचाकीवरून मोबाईलवर संभाषण करणे, तीन सीट घेऊन जाणे असे गैरप्रकार सुरू आहेत. नागरिकांची नेहमीसारखी वर्दळ सुरू असल्याने संचारबंदी खरोखरच लागू आहे का, असा संभ्रम निर्माण होत आहे.
CoronaVirus Lockdown :नागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:15 IST
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी सद्यपरिस्थितीत संचारबंदीची भीती लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असून, दैनंदिन व्यवहारही नित्यनियमाने सुरू असल्याचे चित्र आहे.
CoronaVirus Lockdown :नागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायब
ठळक मुद्देनागरिकांचा मुक्त संचार सुरूच, संचारबंदीची भीतीच गायबअजून किती जणांवर कारवाई करावी