रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील उतारात पादचाऱ्याला धडक देत त्याच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटनेर चालकाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या अपघातात नितीन जानू कांबळे (३८, रा. कापडगाव बौद्धवाडी,रत्नागिरी) या प्रौढाचा मृत्यू झाला हाेता. तर उत्तम कोंडिबा क्षीरसागर (३५, रा. खैराव ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी उत्तम क्षीरसागर कंटेनर (एमएच ४६, एएफ ७५१२) घेऊन जात होता. त्याचवेळी नितीन कांबळे हे मुंबई-गोवा महामार्गावरील रोनीत हॉटेल ते कापडगाव एस. टी. बस स्टॉपजवळ चालत जात होते. त्यावेळी उत्तमचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनरची नितीनला धडक बसून अपघात झाला. यात नितीनला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल मोहन कांबळे करत आहेत.