लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये मंगळवारी पहाटे ‘आयशाबी’ या मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाली होती. त्यातील ४ खलाशी बुडाले होते. त्यातील दोन खलाशांचे मृतदेह मंगळवारीच सापडले होते. उर्वरित दोन खलाशांचे मृतदेह शोधण्यात तटरक्षक दलाची नौका व जयदीप तोडणकर यांच्या नौकेला यश आले. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अब्बास पठाण व तवक्कल अब्दुलसत्तार बांगी यांचे मृतदेह सापडले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ४ झाली आहे.
पाऊस व तुफानी वाºयामुळे ही नौका बुडाली होती. बुडालेल्या चौघांपैकी जैनुद्दिन पठाण आणि हसन पठाण या या दोघांचे मृतदेह मंगळवारी सापडले होते. मात्र अन्य दोघांचे मृतदेह सापडले नव्हते. तटरक्षक दलाची नौका व स्थानिक जयदीप तोडणकर यांच्या नौकेमार्फत या बुडालेल्या खलाशांचा शोध घेतला जात होता. बुधवारी दुपारी त्यातील एक मृतदेह खाडीच्या मुखाशी सापडला तर दुसरा मृतदेह खाडीतून शोधून काढण्यात दोन्ही नौकांना यश आले.
सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दिन लतिफ पठाण हा आयशाबी नावाची मासेमारी नौका (एनडी-एमएच-४-एमएम-२९८१) घेऊन सोमवारी जेवण आटोपून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी समुद्रात केले होते. जैनुद्दिन पठाण याच्यासोबत त्याचे दोन सख्खे भाऊ अब्बास, हसन आणि आणखी एक सहकारी तव्वकल अब्दुलसत्तार बांगी हेही नौकेवर होते. मात्र मुसळधार पाऊस व तुफानी वाºयात हेलकावे खाणाºया या नौकेला जलसमाधी मिळाल्याने चारही खलाशी बुडाले होते. बुधवारी सापडलेले दोन्ही खलाशांचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठविण्यात आले. ही माहिती रत्नागिरीचे तहसीलदार मच्छींद्र सुकटे यांनी दिली.