सुभाष कदम --चिपळूण --भाजपने दोन दिवसांच्या चिपळूण येथील कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देऊन युतीतील आपला सहकारी पक्ष शिवसेनेला फटकारले असून, आगामी निवडणुकीसाठीची आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी याबाबत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याची सूचना केली आहे. येथे काही नाही म्हणून हात चोळीत न बसता सामान्य कार्यकर्त्याला जवळ करा, नेत्यांपेक्षा आपल्याला कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, असे सांगून पक्षवाढीचा इरादा स्पष्ट केला.भाजपची चिपळूण तालुक्यातील ताकद मर्यादित आहे. येथे भाजपचा एकही निवडून आलेला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार नाही. चिपळूण विधानसभा मतदारसंघात तर साधा ग्रामपंचायत सदस्यही नाही. असे असताना जिल्हाध्यक्ष माने यांनी रामदास राणे यांना तालुकाध्यक्ष, संकेत अवेरे युवा मोर्चा अध्यक्ष, तर वैशाली निमकर यांनी शहर अध्यक्ष करुन नवी समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रदेश चिटणीस डॉ. नातू व नीलम गोंधळी यांच्यासह चिपळूण शहरातील भाजप नेत्यांची त्यांना समर्थ साथ आहे. विधानसभेत पराभूत झालेले माधव गवळी हेही दिमतीला आहेत. शहरासह ग्रामीण भागात भाजप वाढीसाठीच येथे कार्यकारिणी घेऊन ‘एकला चलो रे’चा नारा त्यांनी दिला. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षात गटबाजी नको म्हणून इच्छुकांना वाटाण्याच्या अक्षता लावून त्यांनी महिला शहर अध्यक्षा म्हणून प्रभावी काम करणाऱ्या वैशाली निमकर यांना शहर अध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. नगरपरिषद निवडणुकीत कस दाखवा आणि पदे मिळवा, हा अघोषित इशाराही माने यांनी दिला आहे. जनतेसाठी आपण आहोत. आपली जनतेशी बांधिलकी आहे, याची जाणीव ठेवून येथील सत्ताधाऱ्यांना आपली गरज असेल, तर विचारा, आपण विकासासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करून जनतेला दिलासा देऊया. केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे, येथे आपला नगराध्यक्ष होईल, पण, त्यासाठी आपणही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याला शासनाच्या योजनांचा लाभ दिला पाहिजे. सरकार करीत असलेल्या कामांची माहिती दिली पाहिजे. एकूणच मोदी पर्वाचा आढावा त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. नाव न घेता त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली व आसूडही ओढले. सहमतीच्या राजकारणाचा पक्षाला कसा फटका बसला, ते सांगून आता आपण स्वतंत्र लढून पक्ष वाढवायचा आहे, याचे गमक सांगितले. अगदी ग्रामसभेत हजर राहण्यापासून २ कोटी वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून आपले अस्तित्व दाखवणे, हेही आपले काम असल्याचे माने यांनी सांगितले.आमदार प्रवीण दरेकर, जिल्हा प्रभारी व प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनीही आक्रमक विचार मांडून भाजपही आता मुळमुळीत धोरण सोडून आक्रमकपणे जनतेच्या विकासासाठी उतरल्याची जाणीव करुन दिली. कार्यकर्त्यांना बळ देतानाच विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, हे स्पष्ट केले. सर्वच स्तरावर सत्ता स्थापन करून गेली ६० वर्षे रखडलेल्या विकासाला गती देण्याचे काम हे सरकार करणार असल्याचेही या कार्यकारिणीच्या सभेत दिसले. आतापर्यंत भटाब्राह्मणांचा असलेला हा पक्ष आता सर्वसामान्यासाठी काम करीत आहे. बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी कात टाकत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. सत्ता हवी असेल तर सोवळे राहून चालणार नाही. राजकारणाची बदलती स्थित्यंत्तरे ओळखून काम करायला हवे, याची खऱ्या अर्थाने जाणीव पक्षाला झाली असून, त्याप्रमाणे आता पावले पडत आहेत. एक नवा विचार, नवा संकल्प व नवी दृष्टी, नवे व्हिजन घेवून भाजपाची वाटचाल आता सुरु झाली आहे. याचे परिणाम आज नाही तर येत्या काही वर्षात निश्चित जाणवतील, याची चुणूक या सभेत दिसली. एक समर्थ पर्याय म्हणून भाजप निश्चितच उभारी घेत आहे.
भाजपने स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेला फटकारले
By admin | Updated: June 28, 2016 00:38 IST