लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले आहेत. त्यासाठी सेनेविरोधात भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँगे्रस एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. तशा हालचालीही सुरू झाल्याने शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सेना आपला गड राखणार की, विरोधकांच्या डावपेचात सेनेच्या गडाची तटबंदी कोसळणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यात शिवसेना भक्कम आहे. संघटनात्मक पातळीवर सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे हे यश मानले जाते. त्यांनी गावागावात शिवसेनेची चांगली बांधणी व्हावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यामुळे तालुक्यात संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निवडणूक तसेच याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सेनेने सर्वाधिक यश मिळवले आहे.
२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १४ आॅक्टोबरला होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र, आता तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना सेनेतच अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा आहे. यावेळच्या निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करून साळवी यांना नामोहरम करण्याचे राजकारणही संघटनेत खेळले जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची लढाई जिंकणे हे बंड्या साळवी यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.बंड्या साळवी : शिवसेनेचेच वर्चस्वरत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात.शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच.शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसली.साळवींच्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा?विरोधकांनी २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सेनेविरोधात कितीही ताकद उभी केली तरी या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांंकडे व्यक्त केला. शिवसेनेचे तालुक्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी विरोधक डावपेच आखत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही. तालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे, असेही साळवी म्हणाले.