लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावातून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४६५ शाळांपैकी पाच शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मूल शाळेत जाणार म्हणून प्रत्येकाची आई मात्र काळजीतच आहे.
प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना, सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव संमत करण्याची सूचना केली हाेती. त्यानुसार पाच गावांतून ठराव संमत करण्यात येऊन शाळा सुरू करण्याबाबत पालकांचीही संमत्ती घेण्यात आली. जिल्ह्यातील ८४९ गावे काेरोनामुक्त झाली असताना अवघ्या पाच गावांमधील पालकांनीच शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. मात्र सर्वत्र सुरू असलेले लसीकरण, आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. विद्यार्थीही घरी राहून कंटाळले असून ऑनलाइन अध्यापनात भेडसावणाऱ्या समस्यांमुळे मुलेही शाळेत जाण्यासाठी उत्सुक झाली आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या पाच शाळांमध्ये २५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली असून टप्प्याटप्प्यांनी उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. पालकांची संमती मिळाल्यानेच वर्ग सुरू झाले आहेत.
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!
माझी मुलगी बारावीला आहे. कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले होते, मात्र बऱ्याच वेळा नेटवर्कमुळे समस्या निर्माण होत असत. शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर गावात बैठक घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळेत पाठवत आहे.
- मानसी मंगेश डिके, पालक, तुरळ
गेले दीड वर्ष शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापन करण्यात येत आहे. परंतु शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली, त्यावेळी आमचीही शाळा सुरू करण्यात आली आहे. मुलांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी वाटते, परंतु शाळेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
- सदिच्छा पाचकले, पालक, तुरळ
कोरोना महामारीत ऑनलाइन अध्यापन स्तुत्य उपक्रम होता. मात्र शाळेतील अध्यापन व ऑनलाइन अध्यापनात कमालीचा फरक आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असणे व वेळेची मर्यादा या दोन्ही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. कोरोनामुळे मुलांच्या आरोग्य सुरक्षेबाबत काळजी वाटते. परंतु ग्रामपंचायत, शाळा विशेष दक्षता घेत असल्याने मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटत नाही.
- शर्मिला येलाेंडे, पालक, तुरळ
शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघाेळही करा!
चार तास सलग वर्ग भरविण्यात येत आहेत. शाळेतून सुटल्यानंतर मुलांना घरी आल्यानंतर थेट आंघोळीला पळावे लागते. खबरदारी म्हणून गणवेष दररोज धुऊन घातला जात आहे. शाळेत येताच मुलांची ऑक्सिजन मात्रा, तापमान तपासले जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात आहे. मास्क लावणे तर सक्तीचा असून पालक मुलांना जादा मास्क दप्तरातून देत आहेत. वर्ग सुटल्यानंतर मुले थेट घरी जात आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात आहे. शिक्षकही येता-जाता मुलांवर लक्ष ठेवून आहेत.