देवरुख : संगमेश्वर
तालुक्यातील वांद्री-उक्षी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात वाहने दरीत कोसळून एकजण ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा घडला आहे. त्यात अरविंद हरिनाथ शर्मा (५२, रा. परळ, मुंबई) असे मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे तर या अपघातात चालक पांडुरंग पाटील आणि जनार्दन माळकर असे दोघेजण जखमी झाले आहेत. अरविंद शर्मा यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक मारुती जगताप यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्याची फिर्याद चालक पांडुरंग पाटील यांनी दिली आहे. हा अपघात वांद्री
येथील अवघड वळणावर झाला. क्वाॅलिस गाडी देवगडवरून मुंबईला जात होती तर इंडिका गाडी आंबेडहून वांद्रीला जात असताना या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. त्यात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करत आहेत.