राजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी ५०० ते ७०० रुग्ण आढळत आहेत. कोकणामध्ये एमबीबीएस व एमडी फिजिशिअन डॉक्टर्सची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात एमबीबीएस व एमडी फिजिशिअन डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाद्वारे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील परिस्थिती अत्यंत भयावह बनल्याचे म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक दिवशी ५०० ते ७०० रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात जे डॉक्टर्स उपलब्ध आहेत, त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाची यंत्रणा चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयावर भार पडत आहे. त्यामुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. कोविडच्या आजारावर मात करण्यासाठी तालुक्या-तालुक्यामध्ये हॉस्पिटल उभारणे व त्यामध्ये एमबीबीएस व एमडी फिजिशिअन डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार साळवी यांनी केली आहे.