सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, त्याकडे अनेक जण विविध कारणांमुळे कानाडोळा करत मास्क न वापरताच फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे.
तालुक्यात आतापर्यंत २३२ जणांचा कोरोनाने मृत्यू तर गेल्या २४ दिवसांत ४ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंत ६४८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत केवळ दोन कन्टेन्मेंट झोन कार्यान्वित आहेत. खेड नगर परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये ३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण उपचार घेत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.