माणगाव : तालुक्यात जलस्रोत असणाऱ्या महत्त्वाच्या काळ नदीमध्ये गेली काही वर्षे प्रदूषण वाढत असल्याचे दिसत आहे. या नदीत माणगाव व गोरेगाव येथे मासेमारी करणारे मासे व कोळंबी पकडण्यासाठी स्फोटक व पीक फवारणी औषधांचा वापर करीत असल्याने नदीत प्रदूषण वाढले आहे. यांच्या वापरामुळे नदीतील मासे व सर्व प्रकारचे जीव संपुष्टात येत आहेत.काळ नदी गोरेगाव ही खाडीला जोडून असल्याने या ठिकाणी चांगल्या प्रकारचे गोड्या पाण्यातील मासे व मोठी कोळंबी मिळते. हे पकडण्यासाठी पाग किंवा जाळे वापरून पकडल्यास कोणतेही प्रदूषण व अन्य जीव मरत नाही. ही मासेमारीची प्रक्रि या वेळखाऊ असल्याने झटपट मासे पकडण्यासाठी तसेच येथे माशांना चांगली बाजारपेठ आहे. यामुळे येथील मासे पकडून विक्री करणारे व्यावसायिक झटपट मासे पकडण्यासाठी स्फोटक जिलेटिन काड्या व अमोनिया कॅम्पचा वापर तर कोळंबी पकडण्यासाठी फवारणी औषधाचा वापर होतो. प्रामुख्याने सायफर मिथेलीन केमिकल असणारे औषध वापरले जाते. या औषध व स्फोटकामुळे प्रदूषण तर होतेच, परंतु नदीतील सर्व जीवजंतू यामुळे नष्ट होतात, यामुळे यांचा वापर थांबला पाहिजे.बाजारपेठेत सहज फवारणी औषधे उपलब्ध होतात तर स्फोटके ही दगड फोडण्यासाठी कॉरी येथे मिळतात. या सर्व गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात, यावर निर्बंध नसल्याने या औषध व स्फोटकांचा वापर करून मासेमारी कमी वेळात मोठ्या प्रमाणात करता येते. मात्र या गोष्टींची भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
काळ नदीत होतेय प्रदूषण
By admin | Updated: April 21, 2017 00:18 IST