तळा : तळा गाव गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या छायेत होते. यावर उपाय म्हणून तळा नळ पाणीपुरवठा कमिटी स्थापन करुन २५ आॅक्टोबर १९७५ मध्ये तळ्याचे सुपुत्र व भारताचे माजी अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख यांच्या हस्ते नवीन योजनेचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. अंदाजे ९ लाख रुपयांची ही योजना होती. त्यात १० टक्के लोकवर्गणी होती. मातीचे धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधून कामाला सुरुवात झाली. पाण्याचा साठा मुबलक झाला पण हे धरण मातीचे असल्या कारणाने गळती सुरू राहिली. धरण गळत असल्याने त्यावेळी घरोघरी नळजोडणी करण्यात आली नाही. तळे गावापासून २ ते ३ कि.मी. दूर असलेल्या अंबेळी येथे १९८५ च्या दरम्यान एक बोअरवेल खणण्यात आली. त्यामुळे धरण पाणीपुरवठा योजनेला अंबेळी बोअरवेल येथील पूरक योजना कार्यान्वित करण्यात आली. गेली अनेक वर्षे धरण योजनेतून वडाची वाडी, मोहिते आळी, पारधी आळी, पुसारी, पुष्पवाटिका, मोहल्ला, कुंभार वाडा व अर्धी बाजारपेठ असा पाणीपुरवठा करु लागले तर अंबेळी बोअरवेल योजनेवरुन राळेची वाडी, मुंठ्याची वाडी, मेट मोहल्ला, फोंडलवाडी, भोईरवाडी, ब्रह्माळी, ब्राह्मण समाज आदी भागात पाणीपुरवठा होत असला तरी उन्हाळ्यात मात्र टंचाईला सामोरे जावे लागते. तळा शहरात १२/१३ वाड्या व सुमारे ६ हजार लोकसंख्या आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा निघावा म्हणून नवीन योजनेसाठी सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले. गेली ३/४ वर्षे या योजनेचे काम चालू आहे. काम अंतिम टप्प्यात असताना तळा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. त्यामुळे हे काम आहे त्याच स्थिती नगर पंचायतीकडे वर्ग करण्याचे निश्चित करण्यात आले. तळा पाणीपुरवठा कमिटी नळपाणी योजना नगर पालिकेकडे देण्यास तयार आहे परंतु नगर पंचायत त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करुन ती योजना ताब्यात घेण्यास विलंब लावीत आहे. याप्रकरणी तळा नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी मंगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, पाणी कमिटी आणि नगरपंचायतीचे नगरसेवक यांची संयुक्तिक बैठक घेऊन त्यावर मार्ग काढून पुरवठ्याचे योग्य नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तळा येथे पाणी असून नियोजनाचा अभाव
By admin | Updated: May 2, 2016 01:10 IST