आगरदांडा : सुमारे अडीच हजार कोटी रूपये खर्च करून जेएनपीटीच्या धर्तीवर दिघी पोर्ट विकसित होत आहे. सध्या या पोर्टचे काम खूप धीम्या गतीने सुरू असून विकासक विजय कलंत्री यांच्याकडील आर्थिक स्रोत कमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिघी पोर्ट विकासकाने महाराष्ट्र शासनाशी केलेल्या करारानुसार दिघी ते माणगाव व मुरूड ते आगरदांडा रस्त्याची देखभाल व दुरूस्ती करणे बंधनकारक असताना अनेक वर्षे झाली तरी दिघी पोर्ट विकासक या करारानुसार वागत नाही. यामुळेच राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.रस्त्याला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. वेळोवेळी शासन दरबारी तक्रारी करूनसुध्दा विकासक दुर्लक्षच करीत आहेत. या भागातील रस्ते लवकरात लवकर तयार करण्यासाठी व गणेशभक्तांची अडचण दूर होण्यासाठी मुरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाचे हत्यार उपसत मंगळवारी राजपुरी खोकरी येथे रास्ता रोको करण्यात येवून दिघी पोर्टमधील अवजड वाहने अडवावी लागणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर यांना दिले आहे.विधान परिषदेच्या सभागृहात हा प्रश्न आ. सुनील तटकरे यांनी उचलून धरला असता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते मात्र अद्याप काहीच काम झाले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. (वार्ताहर)
राष्ट्रवादीचा रास्ता रोकोचा इशारा
By admin | Updated: September 1, 2015 04:39 IST