लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : तालुक्यातील काळीज बिरवाडी येथून एक विवाहित महिला आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाली आहे. २३ जून रोजी हा प्रकार घडला असून, २६ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.सविता नथुराम सुंभे (२८, रा. काळीज, ता. महाड), असे या बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती बिरवाडी येथे भाजीचे दुकान चालवितात. २३ जून रोजी सविता आपल्या लहान मुलाचा जन्मदाखला आणण्यासाठी जाते, असे सांगून आपल्या सानिका (८), सलोनी (६), श्री (४) आणि अथर्व (३ महिने), या चार मुलांसह दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली. बिरवाडी येथे ती पतीच्या दुकानात गेली. दुकानात पती नसल्याने शेजारी विलास शेठ यांच्या लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात जाऊन तिने सुट्या पैशांचा डबा ठेवला आणि तेथून ती आपल्या मुलांसह निघून गेली, ती पुन्हा घरी परतलीच नाही. दोन दिवस तिचा आणि मुलांचा नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती कुठेच न आढळल्याने अखेर नथुराम सुंभे यांनी २६ जून रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपली पत्नी चार मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्र ार नोंदविली. या प्रकरणी अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत.
बिरवाडी येथून चार मुलांसह विवाहिता बेपत्ता
By admin | Updated: June 28, 2017 03:30 IST