मुंबई : जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी शारदामार्इंच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ एप्रिल दरम्यान सायंकाळी ५ ते ९ या वेळेत एस.आर.पी.एफ. मैदान, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एनएच-८, जयकोच, जोगेश्वरी (पू.) येथे भव्य ज्ञानप्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात १४ एप्रिल रोजी एका विशेष अभियानाने करण्यात आली. या महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनतर्फे ‘अवयवदान’ हे अभियान यंदा राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे या तीन दिवसांच्या महोत्सवादरम्यान हजारो लोकांनी अवयवदानासाठी उत्स्फूर्त नावनोंदणी केली. या अभियानांतर्गत शुक्रवार, १४ रोजी जीवनविद्या मिशनच्या बालसंस्कार वर्गात जाणाऱ्या लहान मुलांनी ‘आदर्शांचे आदर्श’ या नवनाट्यातून प्रचंड जनसमुदायाकडे अवयवदानाबद्दल आवाहन केले. या नवनाट्यामधील एक विशेष भूमिका सद्गुरूंचा पणतू यश निखिल पै याने रंगविली. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. विद्याधर लाड व सांगलीचे प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. प्रदीप पटवर्धन यांनी अवयवदान या विषयाबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सद्गुरूंच्या शिष्या डॉ. विद्या जोशी यांनी ‘आरोग्य मनाचे’ या विषयावर मार्गदर्शन केले. या महोत्सवामध्ये १५ एप्रिल रोजी प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरसी’ या विषयावर आधारित आगळेवेगळे असे दिव्य कीर्तन झाले. १६ एप्रिल हा मार्इंचा वाढदिवस असल्याने या दिवशी सर्व नामधारकांच्या उत्साहाला तर अक्षरश: पारावर नव्हता. मार्इंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वधू-वरांचा विवाह उपासनायज्ञाच्या उद्घोषामध्ये पार पडला. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये कोणतेही कर्मकांड केले जात नसून केवळ नामघोष केला जातो. या कार्यक्रमासाठी तीन दिवसांमध्ये राज्यमंत्री रवींद्र वायकर, आ. सुनील प्रभू, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक आदी उपस्थित होते.
माई महोत्सवात अवयवदानाचा संकल्प!
By admin | Updated: April 18, 2017 06:46 IST