सिकंदर अनवारे, दासगांवदासगावमधील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग महाडने या विश्रामगृहाकडे पाठ फिरविल्यामुळे यामधील अनेक वस्तूंची चोरी झाली आहे. तसेच या इमारतींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. शासकीय मालमत्तेची तोडफोड तसेच चोरी होताना कोणात्याही तऱ्हेची तक्रार महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस ठाण्यात दाखल न केल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या हा परिसर दारू पिण्याच्या अड्डा बनला असून, या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.दासगांव या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गालगतच काही अंतरावर ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाची गेली दोन वर्षांपासून अवस्था बिकट झाली आहे. हे विश्रामगृह ५० किमी अंतरावर महामार्गावरचे एकमेव विश्रामगृह आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी विश्रांती तसेच थांबवण्यासाठी एक आधार आहे. गेली दोन वर्षांपासून या विश्रामगृहाच्या इमारतीच्या दुरुस्ती किंवा नवीन बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांचे कोणतेच नियोजन नाही. या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. २००५ मध्ये दासगांवमध्ये दरड कोसळली. दरडग्रस्तांतील अनेक कुटुंबांनी या विश्रामगृहातच अनेक दिवस आसरा घेतला होता. तसेच अनेक रुग्णांवर त्यावेळी या ठिकाणी डॉक्टरांकडून उपचार घेण्यात आले. हे विश्रामगृह एकमेव आधार ठरले. अनेक वर्षांतील इमारत व महत्त्वाची इमारत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडून या इमारतीकडे दुर्लक्ष वारंवार करण्यात आल्यामुळे ती इमारत मोडकळीस आली आहे. महाड पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या वर्षभरात या इमारतीशी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कोणतीच चोरीसंदर्भात तक्रार नाही. (वार्ताहर)
शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था
By admin | Updated: May 9, 2016 02:28 IST