पुणे : लोकसहभागामुळे शाळांचा कायापालट होत असून काही शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेतही खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत. विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आपले शिक्षकही अपडेट असावेत, यासाठी टीइटीच्या धर्तीवर ज्ञानसंवर्धन परीक्षा घेण्याचा विचार करीत आहे. शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या मासिक आढावा बैैठकीत यावर सदस्यांची मते जाणून घेतली असून शिक्षक संघटना, शिक्षक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. सध्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत आहे. ७४० शाळा आयएसओ झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत. विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत. मात्र त्यांना शिक्षणही त्याच दर्जाचे मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे विविध उपक्रम, कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहावे, बौद्धिक व मानसिक विकास व्हावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत सुधारणा व्हावी, बदलत्या शैक्षणिक प्रवाहांची शिक्षकाला ओळख व्हावी, यासाठी ही ज्ञानसंवर्धन परीक्षा घेण्याचा विचार आहे. पहिली ते आठवीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकास नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे कार्यरत शिक्षकांसाठीही अशी परीक्षा व्हावी, यावर समितीच्या बैैठकीत सर्व सदस्यांचे एकमत झाले. या परीक्षेमुळे कोणावरही कारवाई अथवा त्याच्या वेतन, बढतीवर परिणाम होणार नाही, असेही वांजळे यांनी स्पष्ट केले.सध्या विविध क्षेत्रांत कर्मचारी अपग्रेड ठेवण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित असते. पुढील काळात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ही जबाबदारीही राहणार आहे. त्यामुळे आमचे शिक्षकही काळाबरोबर बदलत राहावे, हा एकच हेतू यामागे आहे.- शुक्राचार्य वांजळे, सभापती, शिक्षण समितीही परीक्षा देणे ही सक्ती नसावी. यामुळे कोणावरही कारवाई होऊ नये. फक्त शिक्षक अपगे्रड राहण्यासाठी घेतल्यास हरकत नाही.- खंडेराव ढोबळे, सरचिटणीस, शिक्षक संघ
जिल्हा परिषद शिक्षकांचे ज्ञानसंवर्धन!
By admin | Updated: May 7, 2016 05:08 IST