वाल्हे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कामे वेळोवेळी, योग्य पद्धतीने व चांगल्या दर्जाचे करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील, मात्र काही घरांना मागील काही महिन्यांपासून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे.
भवानीमाता मंदिर परिसरात मागील काही वर्षांपासून परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना, अवजड वाहनांमुळे येथील पाणीपुरवठ्य़ाची पाईपलाईन फुटली असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला. यानंतर रेल्वे स्थानकाजवळील मदनेवस्ती येथून पिण्याच्या पाण्यासाठी एक नळ कनेक्शन येथील ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र मागील महिन्यात ओढा खोलीकरण व स्वच्छ करताना येथील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन तुटली असल्याने, मागील महिन्यांपासून लोहमार्ग ओलांडून पाणी आणावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक सदस्यांकडे याबाबत येथील रहिवाशांकडून वारंवार तोंडी तक्रार करूनही या गंभीर समस्येकडे याबाबत दुर्लक्ष होत असून, पाईप शिल्लक नाहीत अशी कारणे मिळत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मुबलक पाणी असूनही येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत धरून, लोहमार्ग ओलांडून हंडाभर पाणी आणावे लागत आहे.
--
चौकट
वाल्हे ग्रामपंचायतीने दोन-तीन दिवसांमध्ये आमची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरूस्त करून दिली नाही, तर आम्ही स्थानिक रहिवाशी लोकवर्गणीतून पाईपलाईचे काम पूर्ण करणार असल्याचा इशारा येथील रहिवाशी नारायण सपकाळ, भाऊ सपकाळ, महादेव सपकाळ, नरेंद्र सपकाळ, संतोष सपकाळ आदींनी ग्रामपंचायतीस दिला आहे.
----
फोटो क्रमांक : १४ वाल्हे बस स्थानक
फोटो ओळ : हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून वाल्हे येथील ग्रामस्थ लोहमार्ग ओलांडत असताना.