यवत: दौंड तालुक्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी कुल व थोरात गटात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले.राजकीय दृष्ट्या संवेदनशील आलेल्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व सहा वार्ड मध्ये कुल व थोरात गटात थेट लढत तर काही ठिकाणी अपक्ष देखील त्यांचे नशीब आजमावत आहेत.
वार्ड क्रमांक १ , वार्ड क्रमांक ५ व वार्ड क्रमांक ६ मध्ये प्रत्येकी ३ जागांसाठी ६ उमेदवार निवडणुकीत आहेत.या तीनही वार्डात कुल व थोरात गटाच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
वार्ड क्रमांक २ मध्ये ३ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.यातील सर्वसाधारण व महिला राखीव अशा दोन जागांसाठी ४ उमेदवार असल्याने येथेही कुल थोरात गटात लढत आहे.तर नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज असल्याने तिहेरी लढत होणार आहे.
वार्ड क्रमांक ३ मध्ये २ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात असल्याने दोन जागांसाठी तिहेरी लढत येथे होणार आहे वार्ड क्रमांक ४ मध्ये ३ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.यातील सर्वसाधारण महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी ४ अर्ज असल्याने येथे थेट लढत होणार आहे , तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी ४ उमेदवार आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेआडून अनेक राजकीय डाव प्रतिडाव मागील पंधरा दिवसात गाव पुढाऱ्यांकडून सुरू होते. उमेदवारांच्या माघारी होईपर्यंत नेमके कोण कोणाच्या विरोधात याचा थांगपत्ता सर्वसामान्य नागरिकांना लागत नव्हता.मात्र आता अर्ज माघारीच्या मुदती नंतर गावपुढाऱ्यांचे भवितव्य मतदारांच्या हाती गेले आहे. मागील दहा वर्षांपासून माजी आमदार थोरात गटाने यवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. आता सलग तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी थोरात गटाने कंबर कसली आहे.तर आमदार कुल गट देखील मागील दोन पराभव विसरून नव्याने निवडणूक रिंगणात उतरला आहे.