चाकण/ आंबेठाण : भामा आसखेड धरणावरून पुणे शहराला जाणाऱ्या जलवाहिनीला होणारा विरोध तीव्र होत आहे. बुधवारी रासे गावातील नागरिकांनी हे काम बंद पाडले असून गावोगावत या संदर्भात बैठका होत असून विरोध वाढत आहे. शेतकरी येत्या ८ जुलैला खेडच्या तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी सुरु आहे. भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांतून भामा आसखेड धरणाचा उजवा कालवा जात असून, त्यासाठी संपादित करण्यात आलेली जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कालव्याचे काम सुरू करण्यात आले नाही. असे असताना पुणेकरांसाठी बंद जलवाहिनीचे काम जलद होत आहे. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी रासे येथे सुरू असलेले काम बंद पाडले. या वेळी रमेश शिंदे, तुकाराम चौधरी, सुरेश सुतार, गुलाब शिंदे, सूर्यकांत मुंगसे, नामदेव मुंगसे, अनिकेत केदारी, राजू केदारी, हनुमंत डावरे, बाळासाहेब डावरे, कृष्णाबाई दाभाडे, बाळासाहेब वाडेकर, शांताराम डावरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान या प्रश्नाबाबत गावोगावी बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबतची बैठक नुकतीच कोरेगाव (ता. खेड) येथे घेण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील म्हणाले, ‘‘भामा-आसखेड धरणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून शासन भांडवलदारासाठी पाण्याचा उपयोग करीत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग शेतकरी वर्गाऐवजी कारखानदार आणि शहरी भागासाठी शासन करीत आहे. यामुळे शेतकरी चिडला असून, त्याचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील.’’बैठकीला पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल पवार, पंचायत समिती सदस्य सोमनाथ दौंडकर, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, माजी युवक अध्यक्ष चांगदेव शिवेकर, मोईचे उपसरपंच पाटील गवारी, सुनील देवकर, अमोल पानमंद, आनंदराव कोळेकर, सत्यवान नवले, किसन पिंजण, नवनाथ काळे, काळूराम पिंजण, कैलास लिंभोरे, शिवाजी डावरे-पाटील, नंदू निखाडे, सयाजी कोळेकर, प्रदीप नवरे, आनंदा आवरी, दत्तात्रय मांडेकर, रवींद्र गाढवे, गणेश बोत्रे, संभाजी निखाडे, गोविंद घाटे, शिवाजी डावरे-पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
जलवाहिनीचे काम रासे ग्रामस्थांनी पाडले बंद
By admin | Updated: July 4, 2014 06:42 IST