भोर : तालुक्यातील सर्वांत मोठ्या व शहरालगत असणाऱ्या भोलावडे ग्रामपंचायतीने या निवडणुकीत एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. एकीकडे ५0 टक्के महिला आरक्षणामुळे गावांचा विकास खुंटतोय, अशी भावना वाढत असताना महिलाच गावाचा विकास करू शकतील, असा विश्वास दाखवत ग्रामस्थांनी सर्व महिला सदस्य बिनविरोध निवडून देऊन त्यांच्या हातात गावाच्या विकासाच्या चाव्या दिल्या आहेत. या निवडणुकीत भोलावडे गावचे सरपंचपद अनुसूचित जातीच्या स्त्रीसाठी राखीव आहे. सरपंचपद हे महिलेसाठी राखीव असल्याने ग्रामस्थांनी बैैठक घेऊन गावाचा कारभारी महिला व इतर सदस्य पुरुष राहिले, तर काही भविष्यातील अडचणींचा व विकासाचा विचार करून सर्वच सदस्य महिला राहिल्या तर. असा प्रस्ताव ठेवला. त्याला ग्रामस्थांनीही सर्वानुमते सहमती दिल्याने ४ आॅगस्टला गावात निवडणूक न होता सर्व महिला बिनविरोध सदस्य केल्या. काल (शनिवारी) गावच्या सरपंच व उपसरपंच पदासाठीही बिनविरोध निवड झाली आणि गावाचा कारभार खऱ्या अर्थाने महिलांनी हाती घेतला. सरपंचपदी प्रज्ञा गजानन रणखांबे, तर उपसरपंचपदी अश्विनी राजाराम आवाळे यांची निवड करण्यात आली आहे. यातही विशेष म्हणजे सरपंच झालेल्या प्रज्ञा रणखांबे या अविवाहित असून पदवीधर आहेत. सदस्यपदी असलेल्या इतर महिलाही शिक्षित आहेत. सरपंच, उपसरपंचांसह सर्वच्या सर्व सदस्य महिला असल्याने भोलावडे ग्रामपंचायतीवर १०० टक्के महिलाराज आले आहे.आपल्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती ही पदे जर महिला सांभाळू शकतात, तर गावाचा कारभार महिला का हाकू शकत नाहीत, असा ठाम विश्वास व्यक्त करीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे यांनी सांगितले की, या महिला आमच्या गावाचा नक्कीच विकास करतील. आम्ही ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असून, गावच्या कारभारी महिला झाल्या तर गावाचा विकास कसा होऊ शकतो, हे आम्ही दाखवून देणार आहोत. मुळात गावच्या कारभारात राजकारण येऊ नये म्हणून आम्ही सर्वच महिला सदस्य दिल्या आहेत. आमची ही भूमिका निर्णय ठरेल, असेही शेवटी त्यांनी सांगितले. या संदर्भात सरपंच प्रज्ञा रणखांबे यांच्याशी संपर्क साधला असता, आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी संधी दिली आहे. या संधीचे आम्ही सोने करून दाखवू व गावच्या सर्र्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. राजगड कारखान्याचे संचालक राजेश काळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे, सुनील आवाळे, दत्तात्रय आवाळे, ज्ञानोबा आवाळे, दत्तात्रय गावडे, मोहन आवाळे, शशिकांत जगदाळे, अर्जुन रणखांबे, दत्तात्रय जगदाळे, रामभाऊ रणखांबे, मधुकर आवाळे, बाळासो कुंभार, कालिदास आवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी या सर्व महिला सदस्य व सरपंच, उपसरपंच महिलांना बोलवून त्यांना शुभेच्छा दिल्या व सत्कार केला. (वार्ताहर)
गावाचा कारभार दिला महिलांच्या हाती!
By admin | Updated: August 24, 2015 02:51 IST