माळेगाव : लोक ग्रामपंचायतीकडे लग्नासाठी पैसे मागत नाहीत. त्यांना फक्त पिण्याचे पाणी हवे असते. आपल्याकडे चोवीस तास पेट्रोल मिळते, पण पाणी मिळत नाही. दुबईमध्ये पाऊस पडत नाही, तरीही वाळूत झाडे लावण्याचा प्रयोग केला जातो. ४०० वर्षांपूर्वी जर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात रायगडावर शौचालय वापरले जात होते. तर आता शौचालय उभारण्याची लाज आणि अडचण का वाटते हेच समजत नाही.पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील सांगत होते. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून ‘चला गाव घडवू या’ या अभियानाअंतर्गत आज बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांची ग्रामपरिषद शारदानगर येथील डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडली. या परिषदेस तालुक्यातून महिला सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. या वेळी ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, उपसभापती दत्तात्रेय लोंढे, सदस्या संगीता ढवाण, डॉ. प्रतिभा नेवसे, सुदर्शना तावरे, रेखा सोनवणे, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते. या परिषदेच्या पहिल्या सत्रात पेरे पाटील बोलत होते. ग्रामपंचायतींना थेट निधी खूप मिळणार आहे. तेव्हा गावातल्या प्रत्येक नागरिकाचे हित पाहण्याची आपली भावना असली पाहिजे. गावच्या विकासासाठी आगामी काळात आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.त्यांनी गावकारभारात आलेल्या अडचणी, त्या सोडविताना शोधलेले उपाय याबाबत चर्चा केली. जगातील देशांच्या भ्रमंतीत आलेल्या अनुभवावरून गावच्या विकासाशी घातलेली सांगड सांगता सांगता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. पेरे पाटील म्हणाले आम्ही आमच्या गावात दररोज ज्यांचे वाढदिवस आहेत, अशांची यादी फळ्यावर लिहितो. गेल्या वीस वर्षात सरपंच, उपसरपंच, सदस्य अथवा ग्रामसेवकाने एक पैचाही भ्रष्टाचार केला नाही. गावाने एकोप्याने काम केल्यास चांगले काम घडून येऊ शकते. विकास म्हणजे केवळ इमारती, रस्ते हे स्वरुप नको आहे. पंचायत समिती सभापती करण खलाटे यांनी प्रास्ताविक केले. आर. एम. पुरी यांनी सूत्रसंचालन केले.
शौचालय उभारण्याची लाज का वाटते?
By admin | Updated: October 12, 2015 01:26 IST