लक्ष्मण मोरे, पुणेपोलिसांना सुटीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून, पोलिसांना अद्यापही जुन्याच दराने भत्ता देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी पसरली असून, त्याबाबतचा आदेशच पोलिसांना प्राप्त झालेला नसल्यामुळे शासनाने पोलिसांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे. राज्यातील पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे राजकीय सभा, कार्यक्रम, निवडणुका, आंदोलने, दंगली, व्हीआयपी दौरे आदी घटनांवेळी पोलिसांच्या हक्काच्या सुट्या रद्द केल्या जातात. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तामध्ये उभे केले जाते. अनेकदा वैद्यकीय कारणास्तव तसेच कौटुंबिक अडचणीच्या वेळीही पोलिसांना सुट्या घेता येत नाहीत. सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलिसांना भत्ता दिला जातो. पोलिसांना त्यांच्या एकूण वेतनापैकी मूळ वेतनाच्या प्रमाणात देण्यात येणारा भत्ता म्हणजे पोलिसांची एकप्रकारे केलेली थट्टाच आहे. दिवसभर काम केल्यानंतर ६० ते ९० रुपयांपर्यंतचा भत्ता दिवसभरासाठी देण्यात येतो. पोलिसांना यापुढे सुटीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या घोषणेला महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी अद्याप त्यावर अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. एक दिवसाचा पगार मिळण्याचा आदेश केव्हा येतोय, याकडे पोलिसांचे डोळे लागले आहेत. परंतु, यावर गृह विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय कोणतीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांचे कामाचे तास निश्चित नसल्यामुळे त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या सोयीसुविधा, आरोग्य यांकडे लक्ष देता येत नाही. कुटुंबासोबत कुठे फिरायला जाता येत नाही. यासोबतच वरिष्ठांचा जाच, कामाचा ताण यांमुळे वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीचा पगार मिळणार ही सुखावणारी घोषणा झाली खरी; परंतु त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप सुरू झालेली नाही. पोलिसांना संघटित व्हायचा अधिकार नसल्यामुळे हक्कांसाठी भांडताही येत नाही; त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही काही पोलिसांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतला कुठे गेला एक दिवसाचा पगार?
By admin | Updated: June 11, 2015 06:11 IST