मोरगाव : तरडोली (ता. बारामती) येथे केवळ दोन घरांसाठी पिण्याचे पाणी योजना मंजूर झाली असून तिचे कामही सुरू झाले आहे. मात्र, याच गावात दुसरीकडे गेल्या १५ वर्षांपासून पाणी योजनेची मागणी करणाऱ्या वस्त्यांकडे टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी पाणी योजना मंजूर करता येते़. गावठाण विहिरीवरून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सध्या पाइपलाइन टाकण्याचे काम जोमात सुरू आहे. येथे टँकर अथवा वाहन जात नसल्याचा अडथळा दाखवत ही योजना बसवल्याचे समजते. सुमारे साडेचार लाख रुपयांचे हे काम ग्रामपंचायत स्वत: करीत आहे. सर्व्हे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनीच शासनाची फसवणूक केली आहे. तसेच ही वितरिका शेतजमीन भिजवण्यासाठीच टाकली जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. या योजनेसाठी येथील एका ग्रामपंचायत सदस्यानेच दहा टक्केरक्कम भरली असल्याचे समजत आहे. यासंदर्भात गामविकास अधिकारी लढकत यांच्याशी संपर्क साधला असता, येथे पाणी जात नाही म्हणून योजना राबवित आहोत.किती लोकसंख्या हा दुय्यम विषय आहे. तर सरपंच ज्योती गाडे यांच्याशी संपर्क साधला असता, येथे टँकर जात नसल्याने लाकवर्गणीतून हे काम होत आहे. (वार्ताहर)
पाणी योजना !
By admin | Updated: December 18, 2014 04:44 IST