बारामती : बारामती, इंदापूर तालुक्यांतील सिंचनासाठी मंगळवारी (दि. २२) दुपारी वीर—भाटघरमधून पाणी सोडण्यात आले. या दोन्ही तालुक्यांतील जवळपास ९ हजार हेक्टर शेतीला हे पाणी मिळणार आहे. ४० दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी मिळणार आहे. उन्हाळी आवर्तनासाठी गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त घेण्यात येणार आहे. तर पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे खात्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी दिली.आज दुपारी २ वाजता धरण साखळीतून नीरा डावा कालव्यात पाणी सोडण्यात आले. हे पाणी बुधवारी (दि. २३) दुपारी बारामती परिसरात पोहोचणार आहे. सध्या कालवा ६०० क्युसेक्सने सोडण्यात आला आहे. उद्यापासून पूर्ण क्षमतेने ८०७ क्युसेक्सने सोडण्यात येणार आहे. पुरंदर, बारामती, इंदापूरमधील शेतीच्या सिंचनासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये बारामती, इंदापूर तालुक्यातील ९ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. विशेषत: दोन्ही तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादकांना दिलासा मिळणार आहे. या आवर्तनासाठी केवळ ३ टीएमसी पाणी मिळाल्याने पाटबंधारे खात्याने अधिक कडक धोरण अवलंबले आहे.> भोर तालुक्यातील घरणग्रस्तांकडून तीव्र विरोधभाटघर, नीरा देवघर या भोर तालुक्यातील धरणं रिकामी होत असून पाणलोट क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. असे असताना बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतीसिंचनासाठी नीरा डावाकालव्यातून पाणी सोडले आहे. याबाबत भोर तालुक्यातील धरणग्रस्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे.