पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टीएमसीने कमी असल्याने या वर्षी महापालिकेस १५ जुलै २०१५ पर्यंत ९.६२ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाकडून मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेने या पुढे पाणी जपून वापरावे तसेच वापर कमी करावा असे पत्र पाटबंधारे विभागाने नुकतेच पालिकेस दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात १५ जुलैपर्यंत शहरास दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेस १० ते ११ टीएमसी पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाच्या या पत्रामुळे पालिकेस लवकरच पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात १५ आॅक्टोबर रोजी २८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत धरणातील सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ५.५३ टीएमसी पाणी दिले आहे. त्यामुळे धरणात सद्यस्थितीस २२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्य शासनाने पालिकेस वाढीव पाणीसाठा देण्यास नकार दिल्याने पाटबंधारे विभागाकडून वर्षभरासाठी केवळ ११.५० टीएमसी पाणी दिले जाणार आहे. मात्र, पालिकेकडून दरमहा प्रत्यक्षात १.३२ टीएमसी पाणी घेतले जात आहे. त्यामुळे मंजूर कोट्यापेक्षा महापालिका जादा पाणी वापरत आहे. (प्रतिनिधी)
जपून वापरा पाणी
By admin | Updated: December 19, 2014 01:51 IST