पिंपरी : प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणाऱ्या फसवणुकीबाबत व अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक आहे, असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. सांगवी येथील स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये झालेल्या अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सरदेसाई यांचा सत्कार सहायक आयुक्त आशादेवी दुगुर्डे व प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ग्रंथपाल कल्पना जाधव व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. भारतातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहणे महत्त्वाचे असून, रोजच्या जीवनक्रमात प्रत्येक ग्राहकाच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत प्रत्येकाने जाब विचारला पाहिजे. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे याबाबतची माहिती समजून घेणे गरजेचे आहे. हॉस्पिटल, न्यायालय, वाहन परिवहन, हवाई सेवा, जलप्रवास, विद्युतसेवा, सर्व राज्यांतील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्याकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शी करण्यासाठी ग्राहक पंचायतींची आवश्यकता आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, तसेच सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या अडाणीपणामुळे लोकांचे शोषण होत असून, यामुळे त्यांचा अर्थिक दर्जा उंचावत नसल्याने सामाजिक असमतोल वाढल्याचे दिसून येते, असे सरदेसाई म्हणाले. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी बोदडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.(प्रतिनिधी)
ग्राहक सरंक्षण कायदा समजून घ्या
By admin | Updated: December 24, 2015 00:37 IST