भोर: जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्ष मौसमी बर्डे यांनी सांगितले. पावसाचे पडणाऱ्या, पाणीच्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये. पाणी जमिनीत मुरावे आणी टंचाई दूर व्हावी म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे,एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, लोकसहभाग देणारी गावे व आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेली भोर तालुक्यातील गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. गावांसाठी नेडल अधिकारी नेमण्यात आला आहे. सन २०१६/१७ या वर्षासाठी १२ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. गावात कृषी, वन, छोटेपाटबंधारे, ग्र्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत तर गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण, दुरुस्ती ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून विविध प्रकारची कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधीचा अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे या भागातील अधिकाधिक गावांची निवड जलयुक्त शिवार योजनेत करून निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करता येऊन या भागातील अनेक गावांतील टंचाई दूर करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावात पावसाचे पडलेले पाणी गावातच जिरवून, मुरवून, नाला खोलीकरण, सरळीकरण, समतल चर, शेततळी, ओढे, कोल्हापूर पद्धतीचे नवीन बांधणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, विहिरीतील गाळ काढणे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्त करणे ही कामे करून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता येऊ शकते. त्यासाठी भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, खासगी उद्योजक, कंपनीवाले व गावागावांत सर्व विभागाचे प्रमुख व लोकांच्या बैठका घेऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करून गावातील टंचाईचा आढावा घेऊन आराखडा तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)
भोरमधील बारा गावे होणार जलयुक्त
By admin | Updated: March 21, 2016 00:34 IST