निरगुडसर : येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि तरकारी पिकांना भाव मिळत नसल्यामुळे कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे़ याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारावर झाला असून नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या डिंभे धरण उजवा आणि डावा कालवा, तसेच घोड नदीला असणाऱ्या बारमाही पाण्यामुळे तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये भाजीपाला आणि तरकारी पिके शेतकरी घेत असतात़ कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन काढून पैसे मिळवण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल असतो़ परंतु सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे भाजीपाला आणि तरकारी पिकांचा उत्पादन खर्च तर लांबच. त्यामुळे काढणीअभावी शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली असून काही शेतकऱ्यांनी जनावरे शेतात सोडली आहेत़ काही शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन गेलेला शेतमाल तेथेच फेकून द्यावा लागला आहे़ गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब येवले यांनी सांगितले़ (वार्ताहर)
तरकारी पिकांना कवडीमोल भाव
By admin | Updated: January 9, 2017 02:16 IST