खेड तालुक्याला अनेक प्रकल्पांनी चोहोबाजूंनी घेरल्याने शेतीप्रधान असलेल्या या तालुक्यातील शेतजमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित होत चालल्याने शेतकऱ्यांना देशोधडीला जाण्याची वेळ आली आहे. सरकारी पडजमिनीवर प्रकल्प उभे न करता शेतकऱ्यांच्या पिकांच्या जमिनी संपादित होत असल्याने यातून आपली जमीन वाचवण्यासाठी शेतकरी जिवाची पर्वा न करता अजूनही आंदोलन करतो आहे.
एमआयडीसी प्रकल्पबाधित हताश -
चाकण औद्योगिक वसाहतीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये तालुक्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागातील गावांमधील हजारो हेक्टर जमिनीवर देशी विदेशी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. तर पाचव्या टप्प्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे. परंतु स्थानिक तरुणांना कंपन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी रोजगार आणि नोकरी आजपर्यंत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमीन परताव्याचे गोंधळ अजूनही सुरू आहे. शासन दरबारी हेलपाटे मारून थकले मात्र प्रश्न सुटले नाहीत.
तीन धरणे उशाला कोरड घशाला
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कुशीतील पाण्यावर भामा आसखेड,चासकमान आणि कळमोडी सारखी मोठी धरणे आहेत.या प्रकल्पासाठी शासनाने अक्षरशः कवडीमोल किंमतीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या.प्रकल्प होऊन अनेक वर्षे लोटली, मात्र प्रकल्पबाधित अजूनही पुनर्वसन झाले नाही. त्यांना अजूनही आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करावे लागते आहे.
रिंग रोड आणि रेल्वेसाठी भूसंपादन
खेड तालुक्यातून रिंगरोड आणि रेल्वे या दोन प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. यामुळे काही गावांमधील शेतकरी अक्षरशः पार कोलमडून पडणार आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे खेड तालुक्याला काहीही फायदा होणार नाही.यामुळे बाधित शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र होत चालले आहे.
पुन्हा विमान लागले घिरट्या घालू
पुणे जिल्ह्यातील नियोजित विमानतळासाठी तीन जागांची पहाणी करुन माहिती गोळी केली जात आहे.विमानतळासाठी अद्यापही कोणतीही जागा निश्चित केलेली नाही.पुरंदर,चाकण,खेड या तीन जागांपैकी जी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल त्या ठिकाणी विमानतळ करावे लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केल्याने खेड परिसरातील जागेचा विचार सुरु असल्याचे सुतोवाच मिळत आहेत.त्यामुळे तालुक्यात पुन्हा विमान घिरट्या घालू लागले आहे.
चाकण एमआयडीसी.