शिक्रापूर : कांद्याने रडवले, बटाट्याने फुगवले तर टोमॅटोने फसवले अशी अवस्था सध्या शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. माझरे मळा या भागातील शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर आदी गावांमध्ये मागील काही वर्षांत थिटेवाडी बंधाऱ्याचे वरदान लाभले. त्यातच काहीशा बागायत व जिरायत क्षेत्रावर सालचंदी ठरवणारा या भागातील शेतकरी मागील काही महिन्यांत शेतमालाच्या बाजारभावाने अडचणीत आला आहे. मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड या भागात झाली. कांद्याला बाजारभाव कोसळल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले. कांद्याने रडवल्याची भावना पाबळ येथील शेतकरी धनेश साकोरे यांनी व्यक्त केली, तर बटाट्यासाठी अनेकांनी पुणे जिल्ह्याबरोबर बाहेरील परराज्यांतून, राज्यातून कर्ज काढून बियाणे आणून बटाट्याची लागवड केली. काढणी झाल्यानंतर बटाट्याचे बाजारभाव कोसळले. कर्जाचा फुगवटा वाढला. कर्जाने शेतकऱ्यांना फुुगवले. त्यापाठोपाठ आता टोमॅटोने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक टोमॅटो लागवड करणारे अनेक प्रगत शेतकरी मेटाकुटीला आले असल्याचे प्रगतशील शेतकरी पांडुरंग लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा, बटाट्याबरोबरच आता टोमॅटोनेदेखील फसवल्याने इतर तरकारी पिकांकडे या भागातील शेतकरी वळला आहे. वर्षाची सालचंदी धोक्यात आल्याने अनेक शेतकरी कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडली आहेत. (वार्ताहर)
बाजारभावाअभावी टोमॅटो मातीमोल
By admin | Updated: January 23, 2017 02:41 IST