पुणे: ‘‘दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडवं...,’’ अशा सूचना देणारे पालक आणि बैठक क्रमांक शोधण्यासाठी परीक्षा केंद्रात धावाधाव करणारे विद्यार्थी. तर पहिला पेपर मराठीचा, चांगला सोडव अशा एकमेकांना शुभेच्छा देणारे मित्र, असे चित्र मंगळवारी शहरातील विविध शाळांसमोर दिसून आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दहावीची परीक्षा सुरू करण्यात आली. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी दहापासूनच पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. बोर्डाचा पहिलाच पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधूूक होती. पालक विद्यार्थ्यांची समजूत काढून शांतपणे पेपर सोडव, मराठीचा पेपर आहे, घाबरू नकोस. प्रश्नपत्रिका मिळाली की ती पहिल्यांदा वाचून काढ, अकरा वाजल्याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करू नकोस, असे सांगताना दिसत होते.परीक्षा केंद्राबाहेर पडल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालक दुसरा पेपर कोणत्या परीक्षा केंद्रावर आहे, याची माहिती घेताना दिसत होते. तर कोणते कोणते प्रश्न सोडविले, असे विचारून काही पालक परीक्षा केंद्रावरच मुलांची शाळा घेत असल्याचेही चित्र दिसून आले. (प्रतिनिधी)४मुले परीक्षा केंद्रात गेल्यानंतर पालकांची अस्वस्थता वाढली होती. मात्र, परीक्षा देऊन आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून पालकांची अस्वस्थता कमी झाली. ‘‘ बाबा, पेपर सोप्पा गेला..., सर्व प्रश्न वेळेत सोडवले. चांगले मार्क पडतील’’ असे मुलांनी सांगताच पालक मोकळा श्वास घेत होते.४दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिल्यामुळे कोणता प्रश्न कधी सोडवावा, याचा निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळाला. नियोजन करता आले. विचार करण्यास वेळ मिळाला. त्यामुळे सर्व पेपर वेळेत सोडवता आला, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी जयेश वाखरे व प्रतीक्षा डोंगरे यांनी व्यक्त केली.
टिक् टिक् वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात...!
By admin | Updated: March 4, 2015 00:32 IST