पुणे : “काळाला काय हवे हे ओळखणारे द्रष्टे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकर होते. या दोघांना दीर्घायुष्य मिळाले असते तर भारताचा इतिहास कदाचित वेगळा असता,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी केले.
महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास संशोधक संजय सोनवणी लिखित ‘द अनसंग हिरो ऑफ इंडिया -महाराजा यशवंतराव होळकर’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन प्रा. हरी नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि लेखक संजय सोनवणी आणि प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश खाडे उपस्थित होते.
इतिहासकार हे मेहनत करून पुस्तके लिहितात. पण, ती योग्यरीत्या समाजासमोर आणली जात नाहीत हे दुर्दैव असल्याची खंत प्रा. नरके यांनी व्यक्त केली. उदात्तीकरण म्हणजे इतिहास नाही. इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणे महत्त्वाचे असते. कोणताही इतिहास अंतिम नसतो. तो काळानुरूप नव्याने उलगडत जातो. असा इतिहास अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे नव्या पिढीसमोर मांडला पाहिजे, असे ते म्हणाले.
“महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासारखा महान पराक्रम गाजविणाऱ्या राजाने कधी विश्रांती घेतली नाही. सतत संघर्ष आणि लढाई केली. पण त्यांच्याबद्दल कुणी साधी माहिती देखील करून घेत नाही. या महापुरुषांबद्दल थोडी कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे,” असे सोनवणी म्हणाले. आजही ऐतिहासिक अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी साधने उपलब्ध नाहीत. आम्ही मालिका, चित्रपट आणि कादंबरीला इतिहास समजतो. पण तो इतिहास नाही. आपल्या शिक्षण प्रवाहात इतिहासाचे धडे देणारी दृष्टी देखील नाही, असे सोनवणी म्हणाले.
-----------------------------------------------