आपटाळे : जुन्नर तालुक्यातील २० गावांतील नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने आदिवासी जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. १२ गावांतील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे, तर आठ गावांतील नळ पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याने बंद अवस्थेत आहेत, या योजनेकरिता शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत. आदिवासी भागात ६५ गावे असून त्यांपैकी केळी-माणकेश्वर या गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दावा शासनाचा आहे. माणिकडोह धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विहिरीत पाणी कमी असल्याने योजना बंद आहे. या योजनेकरिता सुमारे ३६ लाख रुपये खर्च झाला आहे. सितेवाडी या गावाची नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी योजना बंद आहे. नागरिकांत तीव्र नाराजी आहे. या योजनेकरिता सुमारे २८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. खानापूर गावाच्या योजनेकरिता सुमारे ३४ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या गावाच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्नी आंदोलन छेडले होते. त्याचप्रमाणे गोळेगाव (ठाकरवाडी) येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. गोद्रे या गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्याचप्रमाणे चिंचोली गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे, टाकीचे, दाबनलिकेचे काम पूर्ण आहे, मात्र योजना का सुरू होत नाही, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. नळावणे गावाच्या योजनेकरिता सुमारे ३२ लाख रुपये खर्च करूनही योजना बंद आहे. ऊसरान (खडकुंबे) या गावाची योजना विद्युत पुरवठ्याअभावी बंद आहे. या योजनेकरिता सुमारे २४ लाख रुपये खर्च झाले आहेत. माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कवाडी गावाची नळ पाणीपुरवठा योजना किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे. घाटघर , हडपसर, जळवंडी, मांडवे, तळेरान, तेजूर, हातवीज, अंजनावळे येथील योजना कालबाह्य झाल्याने बंद आहेत. (वार्ताहर)
जुन्नर तालुक्यातील २० गावे तहानलेली
By admin | Updated: May 29, 2014 04:52 IST