मिलिंद कांबळे , पिंपरी वीजगळती आणि चोरीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस दर महिन्यास लाखो रुपयांचे नुकसान होते. वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करूनही हे प्रकार रोखण्यास पूर्णपणे यश मिळालेले नाही. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका भरारी पथकाची निर्मिती केली आहे. याद्वारे परिसरातील मीटरची तंत्रशुद्ध तपासणी करून गळती आणि चोरी शोधून काढून त्वरित उपाययोजना केली जाणार आहे. यामुळे वीजचोरीस आळा बसणार आहे.वीज गळती, चोरी पूर्णपणे रोखण्यासाठी वीज कंपनीने विशेष पथकांची निर्मिती केली आहे. विभागीय क्षेत्रातील केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना या बाबतीत प्रशिक्षण दिले आहे. एखाद्या भागात कारवाई करण्याचे ठरल्यानंतर तासाभरात सर्वांना कार्यालयात बोलावले जाते. तेथून पुढे प्रत्यक्ष कारवाई केली जाते. स्लो आणि फास्ट मीटरची नोंद घेतली जाते. यानुसार चुकीचे आणि नादुरुस्त मीटर बदलले जात आहे. मीटरमध्ये काही बदल केले असल्यास लगेच लक्षात येते. संबंधित ग्राहकावर कारवाई केली जाते. या कारवाई मोहिमेस १ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पिंपरी विभागात १३३ आणि भोसरी विभागात ६० फिडर आहेत. कोणत्या फिंडरमध्ये किती गळती होते, हे महिन्याभराच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यानुसार प्रत्येक फिंडरची ‘ए’ ते ‘जे’ असे दर्जा दिला जाते. पूर्णपणे वीजबिलांची वसूल होणार भाग ‘अ’ वर्गात येतो. या क्रमाने कमी आणि अधिक तोट्यातील फिंडरला दर्जा आहे. ‘अ’पेक्षा खालच्या दर्जाची फिंडरवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. पिंपरी भागात देहूरोड आणि बिलजीनगर, चिंचवड हे दोन फिडर ‘ब’ दर्जाचे आहेत. शासनाची २४ तास वीजपुरवठा करण्याची योजना आहे. मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागांतही टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्ह्यातील सर्वच विभागीय कार्यालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.अशी होते मीटरची तपासणी -प्रशिक्षित कर्मचारी ग्राहकाला न सांगता मीटरची तपासणी करतो. २०० व्होल्टचा बल्ब, होल्डर आणि वायर इतक्या साहित्यावर ही तपासणी होते. मीटरला जोड देत बल्ब पेटविला जातो. एका मिनिटात मीटरवर किती पल्स पडले, याची आकडेवारी घेतली जाते. साधारणत: इलेक्ट्रॉनिक मीटरवर २०० व्होल्टचा बल्ब एका मिनिटास २० पल्स पडतात. त्यापेक्षा कमी किंवा जास्त पल्स पडल्यास मीटर स्लो किंवा फास्ट आहे, हे स्पष्ट होते. पल्सची नोंद घेऊन कमी आणि अधिक नोंद होते. मीटरमध्ये फेरफार केल्यास उघड होते. आवश्यकता भासल्यास कारवाई करून त्वरित नवा मीटर जोडला जातो. यामुळे मीटर तपासणीचा खर्च ग्राहकांना करावा लागणार नाही.पिंपरी विभागीय कार्यालयात १३५ फिंडरपैकी केवळ दोनच फिडर ‘ब’ दर्जाचे आहेत. त्या भागात ही मोहीम सुरू केली आहे. त्यात काही मीटर स्लो आणि फेरफार केल्याचे आढळले आहेत. वीजगळती, हानी टाळण्यासाठी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून शोध घेण्यात येणार आहे. - डी. आर. औंढेकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी भोसरी विभागीय वीज कार्यालय क्षेत्रात एकूण ६० फिडर आहेत. त्यातीत ५९ फिडर ‘अ’ दर्जाची, तर केवळ एकच फिडर हे ‘ब’दर्जाचे आहे. उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक आहे. दर मंगळवारी हे पथक तपासणी मोहीम घेते. मीटरमध्ये त्रुटी आढळल्यास कारवाई करतात. - डी. पी. पेठकर, कार्यकारी अभियंता, भोसरी
वीजगळती रोखण्यासाठी विशेष पथक
By admin | Updated: July 5, 2015 00:40 IST