बारामती : चिमण्यांचे हक्काचे निवासस्थान असणारे जुने वाडे, दगडमातीची घरे नष्ट झाली. त्याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर झाला. त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने अधिवास वाढविण्यासाठी बारामती शहरातील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या युवकांनी शहरात १,००० घरटी लावण्याचा संकल्प केला आहे.स्क्रॅ पच्या दुकानातून पुठ्ठ्यांचे पाईप या युवकांनी मिळविले आहेत. एका बाजूने पूर्णपणे हे पाईप बंदिस्त करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या बाजूने चिमण्यांना प्रवेश करण्यासाठी पाईपची अर्धी बाजू उघडी ठेवण्यात आली आहे. आठ दिवसांपासून शहरात जवळपास १०० घरटी लावण्यात आली आहेत. मार्चअखेर १००० हून अधिक घरटी शहरात लावण्यात येणार आहेत. बबलू कांबळे, विवेक पांडकर, सचिन जानराव, श्रीकांत पवार, धनश्री कांबळे, विनोद पवार, तुषार घाडगे, आनंद सोनवणे, राहुल पेंढारकर आदी युवक एकत्रित आले आहेत. सर्व तरुण नोकरदार-व्यावसायिक आहेत. त्यातून वेळ काढून एकत्र येऊन ते सायंकाळी घरटी बनवितात. त्यानंतर शहरातील विविध परिसरांत ही घरटी लावतात.चिमण्यांच्या घटलेल्या संख्येमागे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, खरे कारण आहे. हा अधिवास या उपक्रमाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक खर्च एकत्रित करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हा उपक्रम शहरातील सर्व भागांत राबविण्यात येईल. नागरिकांचा याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.- बबलू कांबळे, पक्षीमित्र
चिमण्यांना मिळणार हक्काचा निवारा
By admin | Updated: March 20, 2016 04:39 IST