येथील शेतकरी मनोज भीमाजी भुजबळ यांनी आपल्या ६५ गुंठे शेतामध्ये सोयाबीनमध्ये सूर्यफूलाची अंतर्गत लागवड केली आहे. हा शेतकरी नेहमी ऊसलागवड करीत असतो, मात्र चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी दिसल्यामुळे यांनी ऊसलागवड न करता कमी पाण्यावर येणारे पीक घेतले असून, ठिबक सिंचनच्या साह्याने पाणी देत आहेत. या दिवसांमध्ये पाणीही जास्त लागत नाही, मात्र पावसाने ताण दिल्यामुळे पाणी सोडावे लागते आहे. सोयाबीनचे पीक हे तीन महिन्यांमध्ये येते, तर सूर्यफूल चार महिन्यांमध्ये. या वेळेमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल तर हे पीक निघाल्यावर दहाव्या महिन्यातील ऊसलागवड करता येते. योग्य नियोजन व योग्य धोरण करून आधुनिक पध्दतीने शेती केल्यास भरघोस उत्पन्न काढता येत असल्याची माहिती शेतकरी मनोज भुजबळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.
शेतकी अधिकारी अनिल धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक प्रमोद खेडकर व कृषी सहायक गीता पवार यांनी या शेताची पाहणी केली.
परिसरात बाजरीचे पीक कमी होऊन तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. संध्या सोयाबीन हे शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे त्याला चक्रीभुंगा व पाने खाण्याची आळीचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषध फवारणी करतो, अशी माहिती कृषी सहायक गीता पवार यांनी दिली.