लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : चासकमान धरणातून शिरूर तालुक्यासाठी २० दिवसांकरिता डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी ३६ दिवस उलटूनही ते अजूनही सुरू आहे. खेड तालुक्याला धरणातील पाणी संपल्यानंतर, पाणी मिळणार का, असा सवाल शेतकरी विचारत आहे. या धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या, मात्र शिरूर तालुका तुपाशी, खेड तालुका उपाशी असे चित्र दिसत आहे. हे आवर्तन अजून किती दिवस चालणार आहे, या धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे का नाही,असे शेतकरी प्रश्न विचारू लागला आहे.चासकमान धरणातून (दि.३) डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. १४४ किलोमीटर डावा कालवा लांबीचा आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या आवर्तनामध्ये ५ दिवस पाणी वहनासाठी २० दिवस शिरूरसाठी व २०दिवस खेड तालुक्यासाठी असे नियोजन या आवर्तनाचे करण्यात आले होते; मात्र आता ३६ दिवस उलटूनही अजून खेड तालुक्यतील शेतकऱ्यांसाठी पाणी खुले केले नाही, पाणीचोरी होऊ नये म्हणून खेड तालुक्यातील कडधे, कान्हेवाडी, कमान,चास, आखरवाडी, बुट्टेवाडी, पांगरी, काळेचीवाडी, तिन्हेवाडी सातकरस्थळ , भांबुरवाडी, टाकळकरवाडी, मांडवळा रेटवडी,निमगाव, दावडी, चिचोंशी येथे असलेल्या डाव्या कालव्याच्या मोऱ्या-चाऱ्या वर मुरुम टाकून बंद केल्या आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी कालव्यातून वाहणारेपाणी शेतीसाठी घेऊ नये, यासाठी पोलिसाचे भरारी पथक ठेवण्यात आले आहे.कालव्याच्या रस्त्याने दिवस-रात्र पोलीस कडधेपासून ते दावडीपर्यंत लक्ष ठेवून आहे. तसेच, डाव्या कालव्यावर असणाऱ्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी चासकमान धरणाच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणामध्ये १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचे २२ दिवस शिल्लक आहे. विचार केला असता पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना आता हे ४५ दिवसांचे आवर्तन हे शिरूर तालुक्यासाठीच होणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खेड तालुक्यासाठी किती दिवस पाणी मिळणार, अशा चिंतेते शेतकरी आहेत, पाटबंधारे अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कही खुशी कही गम...शिरूर तुपाशी, खेड उपाशी
By admin | Updated: May 10, 2017 03:57 IST