सिंहगड रस्ता : पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ समन्वयकाची भूमिका घेऊन गड-किल्ल्यांच्या विकासाला चालना देणार आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेंतर्गत पुणे विभागात ‘किल्ले सिंहगड’ची पर्यटन महामंडळाकडून निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी सांगितले.‘किल्ले सिंहगड’ येथे पर्यटन महामंडळाच्या वतीने बुधवारी वृक्षारोपण कार्यक्रम झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. चव्हाण म्हणाल्या, ‘‘राज्यातील गड-किल्ल्यांची संख्या व सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना यशस्वीपणे राबविण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर लोकांचा सहभाग व प्रतिसादही मिळणे आवश्यक आहे.’’ विशेष आराखडा तयार करून, गडाच्या सुधारणेची कामे शासन हाती घेणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळून व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी वन, पर्यटन, पुरातत्त्व, ग्रामपंचायत व स्थानिक वनसंरक्षण समिती व ग्रामस्थांमध्ये समन्वय राहिला पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.शाखा अभियंता हनुमंत गळवे, विष्णू आव्हाड, वनपाल पी. आर. कड, तानाजी खाटपे, बबन मरगळे, संदीप सांबरे, गणेश सांबरे, नितीन गोळे, गुलाब भोंडेकर, महादेव पायगुडे, विठ्ठल पढेर, शांताराम लांघी हे उपस्थित होते.वनसंरक्षण समितीचे सुरक्षा कर्मचारी उत्तम खामकर, बच्चन पढेर, भानुदास जोरकर, नंदू जोरकर, नीलेश सांगळे, अनिल जोरकर, विकी दुधाणे, संजय गायकवाड, सुरेश सांगळे, राजू बडदे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
‘स्वच्छ भारत अभियाना’त सिंहगड
By admin | Updated: July 10, 2015 01:58 IST