मढ : बनरफाटा-जुन्नर मार्गावरील खड्डे, मुख्य चौक व बनकरफाटा परिसरात खड्ड्यामध्ये साचणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी व मातीमुळे चिखलाने घसरगुंडी झाल्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातातही वाढ झाली आहे.बनकरफाटा-जुन्नर मार्गावरील सर्व खड्डे बुजवणे व सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे, म्हणून आमदारांकडून सूचना करण्यात आल्यावर संबंधित विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी बनकर फाटा येथे येऊन पाहणी केल्यावर त्वरित कारवाई होईल, असे वाटले होते. परंतु, बोलाची कढी व बोलाचाच भात या म्हणीप्रमाणे सर्व येऊन गेले. परंतु, प्रश्न मार्गी लागला नाही.दोन ते तीन दिवसांपूर्वी बनकर फाटा-जुन्नर मार्गावरील बनकर फाटा चौकातील जवळच जेथे संबंधित खात्याकडून खड्डे भरण्यासाठी माती टाकण्यात आली होती. तेथे पाणी व मातीच्या चिखलामुळे घसरगुंडी झाली व त्यातून घसरून पडलेले दुचाकीस्वार महादू चिमाजी बनकर यांचा पाय मोडला असून आहे. त्यानंतरही या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे विभागीय अभियंते एन. जी. वैष्णव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.(वार्ताहर)
सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: January 21, 2015 23:12 IST