लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या अपूर्ण राहणे, शाळांच्या तपासणी न होणे यामुळे बहुतेक खासगी शाळांची घंटा सोमवारी (दि. ४) वाजलीच नाही. महानगरपालिकेच्या निम्म्या शाळा वगळता इतर शाळा बंदच ठेवण्यात आल्या. पुढील एक ते दोन दिवसांत शिक्षकांच्या चाचण्या पुर्ण होतील, त्यानुसार शाळा सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यापुर्वी शाळांमध्ये सर्व शिक्षकांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक सुचनाफलक आदी तयारी शाळांना करण्यास सांगितली आहे. आतापर्यंत दोन वेळा शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर करूनही त्यादिवशी शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. सुरु झालेल्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवण्याइतपत ठळक होती. कोरोना संसर्गाच्या भीतीने पालकांनी मुलांना संमतीपत्रे दिली नाहीत.
त्यामुळे ४ जानेवारीला शाळा सुरू होणार की नाही, याबाबत शाळा व्यवस्थापनासह शिक्षकही संभ्रमात होते. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या झाल्या नाहीत. तसेच महापालिका प्रशासनाकडूनही शाळांची तपासणी पुर्ण झाली नव्हती. त्यामुळे सोमवारी शहरातील बहुतेक खासगी शाळा बंद राहिल्या. दरम्यान, महापालिकेने सोमवारपर्यंत ३८२ शाळांची तपासणी पूर्ण केलेली असून पालिकेच्या ४४ शाळांसह खासगी ८२ शाळांना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत शाळा सुरू होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
“शाळा सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. त्याचे अहवाल मिळाल्यानंतर महापालिकेकडून तपासणी करून मान्यता मिळेल. बुधवारी शाळा सुरू होऊ शकेल.”
- कल्पना साळुंके, मुख्याध्यापिका, भारत इंग्लिश स्कुल
चौकट
“शिक्षकांची चाचणी पूर्ण न झाल्याने सोमवारी शाळा सुरू होऊ शकली नाही. बहुतेक शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल एक-दोन दिवसांत मिळाल्यानंतर शाळा सुरू होईल.”
- सतिश गवळी, मुख्याध्यापक, मॉडर्न हायस्कुल
चौकट
मुले कंटाळली ऑनलाईनला
“मुले ऑनलाइन शाळेला कंटाळली आहेत. नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना, मित्रांना भेटण्याची मुलांची उत्सुकता वाढली आहे. मुले स्वतःची काळजी घेऊन शाळेत जातील. शाळाही खबरदारी घेत आहे.”
सुदर्शना भोसले, पालक
चौकट
“शाळेने पालकांकडून संमतीपत्र मागून घेतले आहे. सर्व जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. एखाद्या मुलामुळे सर्वच धोक्यात येऊ शकतात. शाळा सुरू झाल्यावर ते एकत्र येणारच आहेत. त्यातून आता नवीन ‘स्ट्रेन’ आलेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे का नाही, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.”
-प्राची धारणे, पालक