पुणे : गणेश प्रतिष्ठापनेबरोबरच महापालिकेने १० दिवसांनंतर येणाऱ्या गणेश विसर्जनाचीही तयारी पूर्ण केली आहे. अर्ध्या दिवसाच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सोमवारी काही घाटांवर झाले. दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी पालिकेने सर्व घाटांवर तयारी पूर्ण केली आहे.गणेशविसर्जनासाठी मुठा नदीच्या शहरातील बहुतेक घाटांवर गर्दी होते. सामान्यत: गणेशविसर्जन १० दिवसांनंतर होत असले, तरी अर्ध्या दिवसाने म्हणजे आजच (सोमवारी सायंकाळी) तसेच दीड दिवसाच्या (मंगळवारी सायंकाळी) गणपतीचे व गौरींबरोबरच काही गणपतींचे विसर्जन होत असले. याचे प्रमाण किरकोळ असले तरीही पालिकेला पहिल्या दिवसापासूनच विसर्जनाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.अर्ध्या दिवसाच्या गणेशविसर्जनाची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. साधारण १०० गणपती असे अर्ध्या दिवसातच विसर्जित केले जातात. पुण्याच्या मध्य भागात तसेच कात्रज वगैरे परिसरातील काही कुटुंबांमध्ये असे अर्ध्या दिवसाचे गणपती आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची संख्याही फार मोठी नाही. त्यातील बहुतेक गणेशमूर्ती परिसरातील विहिरींमध्येच विसर्जित केल्या जातात. फार थोड्या मूर्ती विसर्जनासाठी घाटावर येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी नदीत पाणी सोडले जात नाही. मात्र, बाकी व्यवस्था करावीच लागते.सात दिवसांनंतरच्या गणेशविसर्जनाची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी घाटांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. त्या वेळी आवश्यकता असेल तर नदीत पाणी सोडले जाते. (प्रतिनिधी) ।अर्ध्या दिवसाचे गणपती म्हणजे सकाळी मुहूर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. नैवेद्य दाखवून विधिवत आरती तसेच अन्य धार्मिक विधी केले जातात. दुपारचे भोजन झाल्यानंतर सायंकाळी मूर्तीचे विसर्जन केले जाते. ही संख्या मोजकीच असल्याची माहिती सुरेश जगताप यांनी दिली.निर्माल्य टाकण्यासाठीचे हौद आहेत. तसेच हौद सर्व घाटांवर ठेवण्यात आले आहेत. मूर्ती विसर्जनही हौदात करावे, असे अपेक्षित आहे. त्यासाठीही हौद उपलब्ध करून देण्यात आले आहे. या हौदांमध्ये या वर्षी अमोनियम बायकार्बोनेट ही पावडर मिसळण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तींचे त्वरित विसर्जन होते. हे पाणी थेट रोपांना टाकले तरी त्यापासून काहीही हानी होत नाही. मात्र, मूर्ती हौदातच विसर्जित करावी अशी सक्ती नाही, ते ऐच्छिक आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणसंवर्धनाची जाणीव वाढल्यामुळे मूर्ती हौदात विसर्जित करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सुरेश जगताप यांनी दिली.
अर्ध्या दिवसाच्या गणरायाला निरोप
By admin | Updated: September 6, 2016 01:00 IST