भानुदास पऱ्हाड, शेळपिंपळगावएका दुर्दैवी अपघातात आपला काळजाचा तुकडाच गमावून बसलेल्या बापावर दु:खाचा डोंगर कोसळला. काबाडकष्ट करून, प्रसंगी कर्ज काढून एकुलत्या मुलाला इंजिनियर केले, आता-आता कुठे त्याच्या करियरची सुरुवात झाली़, आणि क्षणार्धात सगळे संपले. समोर काळाकुट्ट अंधार... मात्र या परिस्थितीतही खंबीरपणे उभा राहत ‘अवयव दान’ करून ‘त्यांनी’ मोठा आदर्श घालून दिला आहे.रांजणगाव (ता.शिरूर) येथील रस्ता अपघातात ज्ञानेश्वर सुदाम नवले (वय २२ मूळ रा. नांदगाव, ता. निफाड जि. नाशिक) हा नुकताच इंजिनियर झालेला तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते़ अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत होऊन तो निष्क्रिय झाल्याचे निष्पन्न झाले. तरुणाचे वडील व कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी घडला प्रकार त्यांच्या कानी घालून ज्ञानेश्वरच्या अवयवदानाची विनंती केली. आभाळाएवढं दु:ख पदरी पडूनही शेतकरी असलेल्या सुदाम नवले यांनी मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून समाजासाठी काही करण्याचा निर्णय घेतला़ आपला मुलगा गेला, पण त्याच्या हृदयाच्या, डोळ्यांच्या आणि किडनी सारख्या अवयवांच्या रुपाने तो कुणाच्या तरी माध्यमातून जगावा यासाठी अवयव दानाचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वरचा मृतदेह पुण्यातील रुबी हॉलमध्ये आणून सर्व अवयव शास्रीय पद्धतीने काढून घेण्यात आले. सुदाम नवले यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे़ ते शेती करतात़ ज्ञानेश्वरच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षणकर्ज काढले होते़ हाताशी आलेल्या मुलाच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे़
दु:खाचे आभाळ कोसळूनही डगमगला नाही बाप!
By admin | Updated: June 26, 2015 04:12 IST